वर्धा : प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य तसेच आरोग्य उपकेंद्र या सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांना पुर्वी शुल्क द्यावे लागत होते. आता या सर्व रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांना विनामुल्य 32 प्रकारच्या सेवा उपलब्ध होणार आहे. त्यात बालकांपासून तर जेष्ठांपर्यंतच्या विविध सेवांचा समावेश आहे.
शासकीय रुग्णालयांमध्ये विविध रक्त तपासण्या, सोनोग्राफी, ईसीजी, एक्सरे, सीटी स्कॅन या सारख्या चाचण्या मोफत होत असल्याने त्याचा फायदा रुग्णांना होत आहे. दिनांक 1 सप्टेंबर पासून केंद्र शासनाची महत्वाकांक्षी आयुष्मान भव या उपक्रमाची सुरुवात झाली असून 31 डिसेंबर पर्यंत ही आरोग्य विषयक मोहिम राबविण्यात येणार आहे. यामध्ये आबालवृद्धांच्या आरोग्य तपासण्या करण्यात येणार आहे.
या उपक्रमांतर्गत अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील 18 वर्ष वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांची तपासणी विशेष मोहीम राबवून करण्यात येणार असून गुणवत्तापूर्वक आरोग्य सेवा देण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांची 32 सामान्य आजाराची वेळेवर तपासणी करून उपचार करण्यात येणार आहे. तसेच आवश्यकता भासल्यास जिल्हा रुग्णालयस्तरावर शस्त्रक्रीयेसाठी संदर्भित करण्यात येईल.
शासकीय रुग्णालयांमध्ये मधुमेह, कॅन्सर (तोंड), गर्भाशय मुख, स्तनाचा कर्करोग याबाबत तपासणी तसेच क्षयरोग, कुष्ठरोग व इतर सांसर्गिक आजार, माता व बाल आरोग्य, संतुलीत आहार व लसीकरण, नेत्र चिकित्सा याबाबत चार आठवड्यात तपासणी करण्यात येणार आहे. वैद्यकिय महाविद्यालयाच्या माध्यमातून आठवड्याला किमान एक आरोग्य मेळावा घेतल्या जाईल.