जाळपोळ व तोडफोडीनंतर अमरावती बंद : तीन दिवस इंटरनेट सेवा बंद; पोलिस आयुक्तांचा निर्णय

अमरावती : अमरावतीत आंदोलनाने चांगलेच हिंसक वळण घेतले आहे. त्रिपुरा घटनेच्या निषेध करताना दुकान बंद करण्यावरून दगडफेक करण्यात आली होती. शनिवारी बंद घोषित केल्यानंतरही चांगलेच वादंग निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून अमरावती शहरात संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. आता तीन दिवस इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

त्रिपुरा येथील हिंसाचाराच्या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी शुक्रवारी मुस्लीम समाजाच्या संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केले. त्यानंतर शहराच्या काही भागांत दगडफेक झाली. त्यात व्यावसायिकांचे नुकसान झाले. त्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी भाजप तसेच अन्य संघटनांसह शेकडो नागरिकांनी रस्त्यावर उतरून तीव्र निषेध केला.

राजकमल चौकात हजारोंच्या संख्येने पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र जमून निदर्शने केली. शहरातील संवेदनशील परिसर असलेल्या राजकमल चौक, नमुना, जवाहर गेट, जवाहर रोड येथे असलेल्या प्रतिष्ठानात घुसण्याचा प्रयत्न जमावाने केला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर पाण्याचा मारा केला.

अमरावतीत पोलिसांचा तगडा पोलिस बंदोबस्त लावल्यानंतर आज बंददरम्यान झालेल्या तोडफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयातर्फे संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर काही तोडफोडीच्या घटना घडल्या. त्यानुसार फौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम १४४ (१), (२), (३) अन्वये पोलिस आयुक्त कार्यालयाकडून संचारबंदी आदेश लागू करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here