तलावातील पाण्यात आंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू! गुमगाव येथील हृदयद्रावक घटना

आर्वी : तलावातील पाण्यात आंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा त्याच्याच लहान भावाच्या डोळ्या देखत पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना तालुक्यातील गुमगाव येथे घडली. सुशील उर्फ आकाश वसंत गवळी (२५) असे मृतकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, आकाश गवळी आणि त्याचा लहान भाऊ महेश गवळी हे दोघे लहादेवी जंगलात इंधन गोळा करण्यासाठी गेले होते. इंधन गोळा झाल्यावर अंबाझरी तलाव परिसरात असलेल्या झाडाखाली दोघांनीही जेवण केलं. जेवण झाल्यावर आकाश आंघोळीसाठी तलावात उतरला. मात्र, थोड्याच वेळात त्याने गटांगळ्या खाणे सुरू केले. हा प्रकार लहान भाऊ महेशला दिसताच त्याने पाण्यात उतरून आकाशला वाचविण्याचा प्रयत्न आटापीटा केला. त्याचे वस्त्र पकडले, पण, तो पाण्यात बुडला तो परत वर आलाच नाही.

आर्वी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मात्र, तलावाच्या गाळात मृतदेह फसल्याने मृतदेह तलावाबाहेर काढण्यास अडचण झाली. दरम्यान भोई समाजातील लोकांना बोलावून मृतदेह तलावाबाहेर काढण्यात आला. उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी नंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. शनिवारी सायंकाळच्या सुमारास त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पर्यात पत्नी दोन वर्षांची मुलगी, वडील आणि भाऊ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here