अल्लीपूर : वाळूची वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परला अचानक आग लागली. यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. आग लागल्याचे लक्षात येताच टिप्परचालकाने वेळीच वाहनाबाहेर उडी घेतल्याने तो थोडक्यात बचावला. पुलगावच्या भारत नागपाल यांच्या मालकीचा टिप्पर वाळू आणण्यासाठी कात्री घाटात जात होता. भरधाव टिप्पर अल्लीपूर शिवाराता आला असता, वायरिंगमध्ये स्पार्क होऊन टिप्परच्या केबिनमध्ये आग लागली.
शाॅर्ट सर्कीट झाल्याचे लक्षात येताच वाहनचालकाने टिप्पर रस्त्याच्या कडेला उभा करीत वेळीच केबिनमधून उडी घेतली. टिप्परला आग लागल्याचे लक्षात येताच सरपंच नितीन चंदनखेडे यांनी घटनेची माहिती पोलीस, महसूल विभागाला दिली. सुरुवातीला पाण्याच्या टँकरच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर नंतर अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले होते.