रामनगरतून निघाली राजेश-पूजा श्रीवास्तव दाम्पत्याची अंत्ययात्रा! अपघातात झाला मृत्यू; एकाच सरणावर दिला दोघांना भडाग्नी

वर्धा : नागपूर येथे विवाह समारंभाकरिता जात असताना रविवारी सायंकाळी बुटीबोरीला भरधाव स्कॉर्पिओ उभ्या ट्रॅक्‍्टरवर आदळल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात श्रीवास्तव दाम्पत्य जागीच ठार झाले तर परिवारातील पाच सदस्यांसह चालक गांभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती शहरात रात्री पोहोचताच शोककळा पसरली. सोमवारी सकाळी श्रीवास्तव दाम्पत्याची रामनगरातून अंत्ययात्रा निघाली असून एकाच सरणावर दोघांना भडार्नी देण्यात आला. राजेश मुरलीधर श्रीवास्तव (५२) व पूजा राजेश श्रीवास्तव (४५) रा. रामनगर वर्धा, असे मृत दाम्पत्याचे नाव आहे.

हे दोघेही आपल्या परिवारातील पाच सदस्यांसोबत नागपूर येथे विवाह सोहळा असल्याने स्कॉर्पिओने नागपूरला जात होते. बुटीबोरीला चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने उभ्या ट्रॅक्‍्टरला जबर धडक दिली. धडक इतकी भयानक होती की स्कॉर्पिओ पलटी झाली. या अपघातात राजेश व पूजा यांचा जागीच मृत्यू झाला. तर राणी श्रीवास्तव, अमन श्रीवास्तव, संगीता श्रीवास्तव, राकेश श्रीवास्तव सर्व रा. रामनगर व चालक सारंग गोल्हर रा. धामनगाव हे जखमी झाले. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले. या अपघाताची माहिती रात्री वर्ध्यात वाऱ्यासारखी पसरल्याने रामनगर परिसरात शोककळा पसरली. दोघांचेही मृतदेह वर्ध्यात आणल्यानंतर सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. पती- पत्नीची एकाचवेळी अंत्ययात्रा निघाल्याने परिसरात हळहळ व्यक्‍त करण्यात आली. राजेश व पूजा यांच्या पश्चात एक मुलगी व भावंडे असा बराच मोठा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here