

पवनार : परिसरात गेल्या काही आठवड्यांपासून चोरीच्या घटनांनी उग्र रूप धारण केले असून, पोलीस प्रशासनासाठी हे मोठे आव्हान ठरत आहे. शनिवारी (ता.३१) राधा सिटी परिसरात ट्रान्सफॉर्मर ऑइल चोरीमुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्याची घटना घडली. काही दिवसांपूर्वी बसस्थानक चौकातील चार पानटपऱ्या रात्री फोडून त्यातून रोख रक्कम आणि साहित्य चोरी केल्याची घटना देखील घडली आहे.
या घटनांमुळे संपूर्ण पवनार परिसरात नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे सर्वसामान्य व्यापारी, दुकानदार आणि घरगुती वीज ग्राहकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. ट्रान्सफॉर्मर ऑइल चोरी ही केवळ महावितरणचे आर्थिक नुकसान करणारी बाब नसून, संपूर्ण वसाहतींच्या वीजपुरवठ्यावर परिणाम करणारी गंभीर घटना आहे. यामध्ये चोरटे ट्रान्सफॉर्मरचे झाकण उघडून आतले थंडकरण ऑइल काढून नेतात. ऑइल नसल्याने ट्रान्सफॉर्मर ओव्हरहीट होतो आणि त्यात बिघाड निर्माण होतो.
या दोन्ही प्रकारांमुळे पोलीस यंत्रणेसमोर एकाच वेळी आर्थिक गुन्हे आणि सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षेचे आव्हान उभे ठाकले आहे. स्थानिक नागरिक, व्यापारी आणि महावितरणच्या वतीने पोलिसांकडे रात्रगस्त वाढवण्याची, संशयित व्यक्तींवर लक्ष ठेवण्याची आणि महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याची मागणी करण्यात येत आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर सेवाग्राम पोलीसांनी चौकशी सुरू केली असून, लवकरच चोरट्यांना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मुख्य चौकात सीसीटीव्हीच नाही…
पवनार परिसरातील मुख्य चौकात कोणत्याही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे चोरट्यांचे पाय पुढे येत आहेत. या ठिकाणी कोणताही लक्ष ठेवणारा यंत्रणा नसल्यामुळे, चोरटे मोकाटपणे चोरीच्या घटना घडवत आहेत. मुख्य चौकात सुरक्षा व्यवस्था असली तर असे चोरट्यांचे धाडस कमी होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने तातडीने या परिसरात त्वरित सीसीटीव्ही बसवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.