![](https://www.rashtrahitnews.in/wp-content/uploads/2023/11/WhatsApp-Image-2023-11-10-at-8.26.25-PM-1.jpeg)
देवळी : दोन दिवासापूर्वी देवळीच्या शंकर नवरखेले यांच्या धाब्यावर वर्धेच्या काही असामाजिक तत्त्वांनी तलवारीने हल्ला करून साहित्याची नासाडी केली. तसेच व्यावसायिकास जबर मारहाण केली. ही घटना ताजी असतानाच दोन दिवसांच्या फरकाने पुन्हा शिवनेरी धाब्यावर चाकू हल्ल्याचा थरार घडत पानठेला व्यावसायिकाला गंभीर जखमी करण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.
प्रशांत भास्कर देशमुख हा शिवनेरी ढाबा शेजारील पानठेल्याचा चालक असून तो ढाब्यावर ग्राहकांची गर्दी झाल्यावर मदत करतो. घटनेच्या वेळी तो पानटपरीवर उभा होता. दरम्यान आरोपी दीपक बाबाराव पोहरकर रा.भामटीपुरा वर्धा तसेच सोहन अरुण लाकडे रा. इंझापूर व त्याच्या एका साथीदाराने ढाब्यावर गर्दी होत असल्याने त्यांना थोडे बाजूला सरकण्यासाठी विनंती केली, पण याच कारणावरून आरोपींनी वाद करून ढाब्यावरील कांदा कापण्याचा चाकू घेत देशमुख याच्यावर चाकू हल्ला करून देशमुख यांच्या पोटाला गंभीर दुखापत केली.