वर्धा : शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येतात. खरीप हंगामासाठी बहुतांश शेतकरी मोठ्या प्रमाणावर पिककर्जाची उचल करते. हे कर्ज शेतकऱ्यांना कमी दरात मिळावे यासाठी शासन व्याजात सवलत देते. गेल्या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील 824 शेतकऱ्यांना 19 लाखाची व्याज सलवत देण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षातील सततची नापिकी आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना पिककर्जावर अवलंबून रहावे लागते. हजारो शेतकरी दरवर्षी विविध बॅंकांमधून पिककर्जाची उचल करत असतात. या कर्जावर बॅंक आकारत असलेल्या व्याजातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने डॅा.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना सुरु केली आहे. शासनाने सप्टेंबर 2021 मध्ये या योजनेच्या व्याप्तीमध्ये सुधारणा केली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी बॅंका, वित्तीय संस्थांकडून तीन लाख रुपयेपर्यंत उचल केलेल्या अल्प मुदत पिककर्जावर 3 टक्के व्याज सवलत दिली जाते. यासाठी कर्जाचा भरणा शासनाने विहीत केलेल्या मुदतीत करणे आवश्यक आहे. भरणा मुदतीत झाला नसल्यास ही व्याज सवलत देय होत नाही.