देवळी : नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे हतबल झालेल्या जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पहिली घटना देवळी तालुक्यातील दापोरी येथे, तर दुसरी घटना हिंगणघाट तालुकयातील सास्ती येथे घडली. देवळी तालुक्यातील दापोरी येथील शेतकरी अनिल झण्णाबापू कामनापुरे (वय ४०) यांनी शेतशिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांनी शेतीसाठी पाच लाखांचे कर्ज घेतले होते. पण सततच्या नापिकीमुळे ते मागील काही दिवसांपासून विवंचनेत होते.
अनिल कामनापुरे हे पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संजय कामनापुरे यांचे कनिष्ठ बंधू होत. अनिलच्या पश्चात पत्नी, मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे. तर दुसरी घटना हिंगणघाट तालुक्यातील सास्ती येथे घडली. महिला शेतकरी माला नारायण मानकर (४०) यांनी पूर्वी कीटकनाशक प्राशन केले. त्यानंतर त्यांनी विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. मुलीच्या शिक्षणाचा खर्च तसेच शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी, या विवंचनेत मागील काही दिवसांपासून महिला शेतकरी माला मानकर होत्या.
विशेष म्हणजे सुमारे १५ वर्षांपूर्वी मालाचे पती नारायण याचा मृत्यू झाला; तर एक मुलगा वर्धा येथील अग्निहोत्री कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे, तर दुसरा मुलगा हिंगणघाट येथील एका महाविद्यालयात बीएचे शिक्षण घेत आहे. तीन एकर शेतीच्या जोरावर माला या कुटुंबाचा गाडा ओढत होत्या. त्यांनी शेतीसाठी पोहणा येथील बँकेतून कर्ज घेतले होते.