चिकणी : आता रब्बी हंगाम सुरु असून, या हंगामात चणा, गहू पेरणी झाल्यावर ज्यांच्याकडे वीज उपलब्ध नाही, असे शेतकरी अवैध वीज जोडणी करतात. त्यामुळे ही वीज जोडणी कायद्यानुसार अवैध असून, अनेक धोके स्वीकारावे लागतात. यात वेळप्रसंगी जीव संकटात टाकला जातो. त्यामुळे धोका निर्माण होऊन जीव असुरक्षित होतो. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी अशी अवैध वीज जोडणी केल्यास आता गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, असे देवळी येथील उपकार्यकारी अभियंता संजय पाटील यांनी सांगितले.
यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा शेंद्री शिवारात कुपनलिका तसेच मिरची रोपांच्या संरक्षणासाठी तार कुंपणाला केलेल्या अवैध वीजजोडणीचा झटका लागून एकाच घरातील तीन लोकांचा दिवाळीच्या दिवशी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी ग्रामीण भागातील कृषिपंपांसाठी तसेच पिकांच्या संरक्षणासाठी अवैध वीज जोडणी टाळण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. अवैध वीज जोडणी आढळल्यास महावितरण कडून संबंधितांवर विद्युत कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन संजय पाटील यांनी केले.