आर्वी : शहरातील चोरडिया लेआऊट रेल्वे स्टेशन वॉर्ड येथील व्यक्ती दोन दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह परिसरात असलेल्या सार्वजनिक विहिरीतील पाण्यात शनिवारी सकाळच्या सुमारास तरंगताना दिसून आला. त्याने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. या घटनेने परिसयत खळबळ उडाली असून घटनास्थळी नागरिकांची गर्दी उसळली होती.
नीरज सुरेश जोशी (३९ असे मृतकाचे नाव आहे. नीरज गुरुवारी रात्रीच्या सुमारास बेपत्ता होता. त्याचा सर्वत्र शोध घेतला जात होता. मात्र, तो कुठेही मिळून आला नाही. अखेर शनिवारी त्याचा मृतदेहच विहिरीत आढळून आला.
या घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. नीरज हा कडधान्य खरेदी-विक्रीचे काम करायचा. आर्थिक टंचाईने ग्रस्त असल्याने त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आला. त्याच्या मागे दोन मुले, पत्नी, भाऊ, आई-वडील, असा आप्त परिवार आहे.