वर्धा : पूर्वी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युडटीची रक्कम मिळण्यास विलंब होत होता. यामुळे त्यांच्यासह कुटुंबीयांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, आता मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयाकडून सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना महिनाभरातच ही रक्कम मिळत असल्याने एसटीच्या कर्मचाऱ्यांची फरफट थांबली आहे.
वर्धा विभागांतर्गत वर्ध्यासह हिंगणघाट, आर्वी, पुलगाव, तळेगाव (श्यामजीपंत) हे पाच आगार असून एकूण १५०० अधिकारी कर्मचारी आहेत. महिन्याकाठी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर २ कोटी २५ लाखांचा शासनाकडून खर्च होतो. दरवर्षी कर्मचारी निवृत्त होतात. सेवानिवृत्तीनंतर अधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांना एक महिन्यातच भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युडटीची रक्कम दिली जात आहे.
पूर्वी सहा महिने ते. एक वर्षापर्यंत ही रक्कम मिळण्यास विलंब होत असल्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत होता. आता मात्र, देय रकमेची संपूर्ण प्रक्रिया मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयातून होत असल्याने कर्मचाऱ्यांची हेळसांड थांबली आहे.