तब्बल दहा महिन्यांपासून जिल्ह्यातील ग्रंथालयांचे अनुदान थकलेलेच

वर्धा : बदलती वाचन संस्कृती, तुटपुंजे अनुदान, यामुळे ग्रंथालयांच्या स्थितीवर विपरित परिणाम झाला आहे. यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाकडून देण्यात येणारा ४० टक्के निधी अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे ग्रंथालयांची वाट खडतर झाली आहे. जिल्ह्यात ११४ ग्रंथालये असून, २०८ कर्मचारी कार्यरत आहेत. ग्रंथालयांना दोन टप्प्यांत वेतन आणि वेतनेतर अनुदान दिले जाते. ग्रंथालयांना यंदा ५९ टक्केच अनुदान पदरात पडले आहे. त्यामुळे या ग्रंथालयांना वेळेत उर्वरित ४० टक्के निधी उपलब्ध न झाल्याने, त्याचा परिणाम, ग्रंथालयांच्या पुस्तक खरेदीवर, तसेच क आणि ड दर्जाच्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्यात ३१ मार्च, २०२० अखेर सुमारे १२ हजार १४९ ग्रंथालये कार्यरत आहेत. या ग्रंथालयातील ११४ ग्रंथालये वर्धा जिल्ह्यात आहेत. या ग्रंथालयांना पहिल्या टप्प्यातील ५९ टक्के निधी उपलब्ध झाला आहे.

अनुदानात ४० टक्क्यांनी घट झाली असतानाच, कोरोनामुळे ग्रंथालयांच्या वाचक संख्येतही २० ते ३० टक्क्यांनी फरक पडला आहे. त्यामुळे ग्रंथालयांना मिळणाऱ्या वर्गणीवरही परिणाम झाला आहे. अनेक ग्रंथालयांच्या जागेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होतात. त्याद्वारे मिळणाऱ्या भाड्यातून ग्रंथालयांना बऱ्यापैकी उत्पन्न मिळते. मात्र, कोरोना प्रादुर्भावामुळे अद्याप सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झालेले नाहीत. त्यामुळे ग्रंथालयांना या उत्पन्नालाही मुकावे लागत आहे. मिळालेल्या अनुदानात कर्मचाऱ्यांचे पगार द्यायचे की पुस्तक खरेदी करायचे, असा प्रश्न ग्रंथालय प्रशासनापुढे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here