

वर्धा : हनुमान जयंतीच्या निमित्ताने बजरंग दलाच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली बजरंग दलाचे जिल्हा संयोजक बबलू राऊत यांच्या नेतृत्वात काढण्यात आली. सेवाग्राम रोडवरील हनुमान मंदिर परिसरातून रॅलीची सुरुवात झाली.
ही रॅली बस स्थानक चौक, ग्रामपंचायत चौक, बाजार चौक, आबाजी महाराज देवस्थान मार्गे संपूर्ण गावातून मार्गक्रमण करून पार पडली. रॅलीमध्ये ढोल-ताशा पथक, बँड पथक, नृत्य पथक, देखावे, लाठी-काठीचे प्रात्यक्षिक, तसेच राम, लक्ष्मण, सीता यांच्या वेशभूषेत बालकलाकारांचा समावेश होता. मोठ्या प्रमाणात नागरिकांनी रॅलीत सहभाग घेतला.
रॅलीच्या मार्गावर ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले, तर काही ठिकाणी भव्य लंगरचेही आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी गणेश खेळकर, पंकज नेहारे, गजू लोहकरे, निलेश वाघमारे, बंटी लोहकरे, मयूर बांगडे, विजय लाकडे, शुभम खंते, विशाल हिवरे, भारत बावणे, सागर कावळे, शुभम काखे, गोविंद मुंगले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. गावात रॅलीमुळे धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले होते. संपूर्ण कार्यक्रमात शिस्तबद्धतेचे आणि भक्तिभावाचे दर्शन घडले.