

वर्धा : महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे वर्धा शहरात भव्य स्मारक आणि पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी ठाम मागणी सत्यशोधक महात्मा फुले व सावित्रीबाई फुले स्मारक समितीच्या वतीने करण्यात आली. यासाठी वर्धा नगर परिषदेचे प्रशासक यांना आज निवेदन सादर करण्यात आले असून, याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
वर्धा शहरात विविध महापुरुषांचे पुतळे आणि स्मृतीस्थळे उभारण्यात आली आहेत. सावरकर यांचे भव्य स्मारक उभारले गेले असून, संत तुकडोजी महाराज व राजमाता जिजाऊ यांचे स्मृतीचित्रही शहरात उभारण्यात आले आहे. या उपक्रमांमागे स्थानिक आमदार, खासदार आणि नगर परिषदेचा पुढाकार असून विकास निधीचा वापर देखील यासाठी करण्यात आला आहे.
मात्र, स्त्री-शिक्षण, शेतकरी हक्क आणि सामाजिक समतेसाठी आयुष्य वाहून घेणाऱ्या फुले दांपत्याच्या स्मारकाची आजतागायत कुणालाही कल्पना सुचली नाही, हे शहरासाठी लज्जास्पद आहे, असे समितीच्या वतीने नमूद करण्यात आले. या पार्श्वभूमीवर महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचा पुतळा नगर परिषद प्रांगणात उभारण्यात यावा, तसेच नगर परिषदेच्या मालकीच्या जुन्या जागेवर किंवा ठाकरे मार्केटमधील अर्धवट बांधकाम असलेल्या भूखंडावर स्मारक उभारले जावे, अशी मागणी समितीने केली आहे. यासोबतच सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांसाठी ‘म. ज्योतिबा फुले सांस्कृतिक भवन’ उभारण्याचाही प्रस्ताव निवेदनात मांडण्यात आला आहे.
याशिवाय साई नगर येथील एका उद्यानास “सत्यशोधक म. फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले उद्यान” असे नामकरण करावे, अशीही मागणी करण्यात आली. या सर्व प्रस्तावांवर नगर परिषदेने त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा जनआंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशाराही समितीच्या वतीने देण्यात आला. यावेळी गजेंद्र सुरकार, डॉ. अशोक चोपडे, प्राचार्य डॉ. मोहनिश सवाई, ॲड. नंदकुमार वानखेडे, अशोक कांबळे, गुणवंत डकरे, जनार्दन देवतळे, राजेंद्र कळसाईत, कपिल थुटे, विनय डहाके यांची स्वाक्षरी असून, अनेक सामाजिक संघटनांचे प्रतिनिधीही यावेळी उपस्थित होते.