

वर्धा : दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात वरुड येथून आर्वीकडे जाणारी एसटी बस उलटल्याची घटना आज (ता. आठ) दुपारी दोनच्या सुमारास आष्टी तालुक्यातील पांढूर्णा घाट परिसरात घडली. यावेळी बसमध्ये ४४ प्रवासी असल्याचे सांगितले जाते. अपघातात सुदैवान जीवितहानी झाली नसली तरी बसमधील प्रवासी व दुचाकीवरील दोघे, असे १४ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
वरुड आगाराची वरुड-आर्वी बस (क्रमांक एम.एच.४० वाय ५१०३) ही आज दुपारी १२.३० वाजता वरुडवरून आर्वीकडे (जि. वर्धा) जाण्यास निघाली. या बसमध्ये महिला चालक म्हणून किर्ती बोंदरे तर वाहक म्हणून सचिन काळे हे आपले कर्तव्य बजावित होते. दुपारी १.५० च्या सुमारास ही बस धाडी, (जि. वर्धा) येथून पुढे आष्टीकडे जाण्यास निघाली असता पांढूर्णा घाटात आर्वीकडून धाडीच्या दिशेने येत असलेल्या एमएच ३२ एसी ८२४४ या क्रमांकाच्या दुचाकीला वाचविण्याचा प्रयत्न बसचालकाने केला. मात्र यातच ही एसटी बस पूर्णत: उलटली. या बसमध्ये एकूण ४४ प्रवासी होते. या अपघातामध्ये बसमधील १३ ते १४ प्रवासी आणि दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले.
अपघात झाल्याचे कळताच परिसरात असलेल्या गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बसमधील प्रवाशांना बसबाहेर काढले. अपघातातील जखमी प्रवाशांना आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात तर काहींना साहूर (जि. वर्धा) येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलिसांसह एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. सध्या जखमींवर उपचार सुरू असून आष्टी पोलिस पुढील तपास करीत आहेत.