वर्धा : शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना दरमहा स्वस्त धान्याचा पुरवठा केल्या जातो. कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांचे रोजगार गेल्याने धान्य कोंडी टाळण्यासाठी शासनाने नियमित धान्यासोबत प्राधान्य व अंत्योदय गटातील लाभार्थ्यांना मोफत धान्य पुरविण्याकरिता प्रधानमंत्री गरिब कल्याण अन्न योजना सुरू केली. एप्रिल २०२० पासून सुरू झालेल्या या योजनेला शासनाने पुन्हा सहाव्यांदा मुदतवाढ दिल्याने ३० सप्टेंबरपर्यंत मोफतचे धान्य मिळणार आहे.
जिल्ह्यातील आठही तालुक्यात २ लाख ७९ हजार शिधापत्रिकाधारक असून, ११ लाख ३६ हजार ८३६ लाभार्थी आहेत. यामध्ये प्राध्यान्य कुटुंबातील २ लाख १९ हजार ६८५ शिधापत्रिकावर ९ लाख ४ हजार ४९७ लाभार्थी, अंत्योदय गटामधील ४८ हजार २२३ शिधापत्रिकावर १ लाख ७७ हजार ५५४ लाभार्थी तर शेतकरी गटातील १३ हजार ६६२ शिधापत्रिकावरील ५६ हजार ७८५ लाभार्थ्यांचा समावेश आहे. यापैकी अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांनाच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ दिल्या जातो. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ मोफत मिळतात. शासनाकडून या योजनेला डिसेंबर २०२१ ते मार्च २०२२ पर्य़त मुदतवाढ दिली होती; परंतु नुकताच एप्रिल २०२२ ते सप्टेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ दिल्याने लाभार्थ्यांना मोफत धान्याची उचल करता येणार आहे.