समुद्रपूर : तालुक्यातील नारायणपूर (कोळसे) गावात कारणावरून झालेला वाद विकोपाला जावून दोन गटात हाणामारी झाली. यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला तर १२ व्यक्ती जखमी झाले आहेत. तसेच २० ते २५ व्यक्तींना किरकोळ दुखापत झाली आहे. आंनद दौलत सडमाके (६०) असे गंभीर जखमीचे नाव असून त्याच्यावर सध्या सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
माणिक पुंडलिक सडमाके (3८), गजानन आंनद सडमाके (3५), मनोहर महादेव मसराम(3८), प्रमोद महादेव कोराम (३५), मंगेश महादेव मसराम (३४), शत्रुघन कवडू सडमाके (४५), प्रशांत आंनद सडमाके (२७), राजू किसना बारड (५१), रमेश बारई (२७) , दादा श्रीराम बारई (६५),रघुनाथ बारई (५९) अशी जखमींची नावे आहे. या जखमींनाही सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शुक्रवारी सार्यकाळी ७ वाजताच्या सुमारास सडमाके व बारई कुटूंबियांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद उफाळून आला. शाब्दीक चकमक सुरू असतानाच वादाचे हाणामारीत रुपांतरण झाले. दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांवर लाठ्या काठ्यांनी हल्ला केला.
तब्बल अर्धा तास हा थरार सुरू होता. माहिती मिळताच समुद्रपूर पोलिसांच्या चमू गावात दाखल झाली. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना रुणालयाकडे रवाना करण्यात आले. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून गावात आणखी कुठला अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनात समुद्रपूर पोलीस करीत आहेत.