

अल्लीपूर : नजीकच्या कापसी येथील सुनीता रागीनवार या महिला शेतकऱ्याच्या शेतात पडलेल्या वीज तारांचा झटका लागून बैल दगावला. यात त्याचे ९० हजारांचे नुकसान झाले. मात्र, कानगाव येथील वीज वितरण कंपनीचे याकडे दुर्लक्ष होत असून ऐन हंगामात बैल दगावल्याने शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले आहे.
रागीनवार यांच्या शोतात वीजतारा तुटून पडल्या होत्या. याबाबत अनेकदा वीज वितरण कार्यालयाकडे फोन करुन तक्रारी दिल्या. मात्र, कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. शेतात सारणी पाडत असताना बैलाला वीजतारांचा जबरदस्त झटका लागल्याने बैल जागीच ठार झाला. घटनास्थळी जमादार संजय रिठे, संजय वानखेडे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. शेतकरी महिलेने बैलदगावल्याने आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.
शवविच्छेदनासाठी डॉक्टरही मिळेना
महिला शेतकरी या मृत बैल घेऊन अल्लीपूर येथील पशु वेंद्यकीय रूग्णालयात शवव्च्छिदम करण्यासाठी गेल्या होत्या, पण, रुग्णालयात स्थायी डॉक्टर नसल्याने वडनेर येथील डॉक्टरांकडे पदभार दिला आहे. मात्र, डॉक्टर शवविच्छेदनासाठी येऊ शकले नाही. उलट फोटो काढून घ्या, व उद्या या, असे डॉक्टरांनी फोनवरुन सांगितले.