चिकणी : सवंगणी करून ठेवलेल्या हरभऱ्याच्या गंजीला भावाने आंग लावून पेटवून दिल्याने शेतकऱ्याचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना पढेगाव शिवारात घडली असून शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढावले आहे. पढेगाव येथील शेतकरी अमोल मसराम यांनी अडीच एकर शेतात चण्याची पेरणी केली होती. पण, शेतात सिंचनाची व्यवस्था नसल्यामुळे लगतचे शेतकरी संजय आंबटकर, प्रदीप आंबटकर यांच्या शेतातील विहिरीचे पाणी घ्यावे लागणार असल्याने त्यांनी त्यांना चण्याच्या उत्पादनात बटाईदार म्हणून सहभागी केले.
त्यांनी चण्याची सवंगणी करून शेतात गंजी लावली. रविवारच्या रात्री अमोल व प्रमोद मसराम या दोघा भावंडांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने संतापलेल्या प्रमोदने हरभऱ्याची गंजी पेटवून देत अमोल मसराम याचे नुकसान केले. याप्रकरणी सावंगी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अमोल मसराम यास अटक केल्याची माहिती दिली.