

वर्धा : महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित ‘महामानव महात्मा जोतिबा फुले’ या चित्रपटाच्या त्वरित प्रदर्शनाची मागणी बहुजन रयत परिषदेच्या वतीने करण्यात आली. या मागणीसाठी जिल्हाधिकारी वर्धा यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनाचे नेतृत्व परिषदेचे विदर्भ तथा जिल्हाध्यक्ष अजय डोंगरे यांनी केले. त्यांच्या सोबत हिराताई खडसे (महिला आघाडी), नारायण आमटे यांच्यासह विविध कार्यकर्ते उपस्थित होते.
सेंसर बोर्डने या चित्रपटाला प्रदर्शनासाठी मंजुरी दिली असूनही राज्य शासनाकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही, ही गोष्ट लोकशाहीला धरून नसल्याचे परिषदेने म्हटले आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित चित्रपट तरुण पिढीला नवचैतन्य देणारा ठरू शकतो, असे डोंगरे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
“शासन चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी देत नसेल तर आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल,” असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी भैय्या मुंगले (शहर अध्यक्ष), मनोहर डोंगरे, प्रशांत डोंगरे (तालुका अध्यक्ष वर्धा), विनोद आमटे (तालुका अध्यक्ष देवळी), शरलाताई डोंगरे (महिला आघाडी अध्यक्ष, देवळी), सुनील पोटफोडे, किशोर मुंगले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.