कुंपणात वीजप्रवाह सोडल्यास होणार गुन्हा दाखल! आकडे टाकून वीजचाेरीही : महावितरणने घेतली गंभीर दखल

वर्धा : वन्यप्राण्यांपासून होणारी पिकाची नासाडी रोखण्यासाठी काही शेतकरी कुंपणात वीज प्रवाह सोडत असल्याचे महावितरणच्या निदर्शनास आले आहे. परंतु, त्यामुळे वन्यप्राण्यांबरोबरच शेतात कामांसाठी गेलेल्या आणि अनावधानाने कुंपणास स्पर्श करणाऱ्या शेतकऱ्यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू होत असल्याची बाब समोर आली आहे. शिवाय यासाठी वीजही आकडे टाकून चोरून वापरत असल्याचे दिसून आले आहे. याची महावितरणने दखल घेतली असून यापुढे कुंपणात अनधिकृत वीज प्रवाह सोडलेला आढळल्यास संबंधितावर विद्युत कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

मागील काही महिन्यांपासून विजेचा शॉक लागून शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना वारंवार घडत आहे. याची अधिक खोलात जाऊन चौकशी केली असता महावितरणच्या असे लक्षात आले की, शेतकरी पिकाच्या संरक्षणासाठी वीज वाहिन्यांवर आकोडे टाकून वीजप्रवाह थेट कुंपणात सोडतात. त्यामुळे अनावधानाने संपर्कात आलेल्या प्राण्यांसोबत शेतकऱ्यांचेही मृत्यू झाल्याच्या काही घटना उघडकीस आल्या आहेत. एकंदरीत हा प्रकार वाटतो तितका साधा नसून वीजचोरीबरोबरच सदोष मनुष्यवध यासारख्या गंभीर गुन्ह्यांशी संबंधित आहे. तसेच जीवितहानी झाल्यानंतर त्याचा दोष विनाकारण महावितरणवर थोपण्याचा आणि महावितरणकडून भरपाई मागण्याचा कलदेखील दिसून येत आहे.

भरारी पथके शेतशिवारात घालणार गस्त

वीज वाहिन्यांवर अनधिकृतपणे आकोडे टाकून कुंपणात थेट वीज प्रवाह सोडण्याच्या या गंभीर प्रकाराला आळा घालण्यासाठी महावितरणने कायदेशीर कारवाई करण्याचे ठरविले आहे. यासाठी, तांत्रिक कर्मचारी तसेच भरारी पथकाच्या माध्यमातून शेतशिवारात गस्त घालण्यात येणार आहे. त्यावेळी हा प्रकार आढळला तर संबंधित शेतकर्‍यांवर विद्युत कायद्याच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे तसेच संभाव्य जीवितहानीची शक्यता लक्षात घेऊन संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची विनंती पोलिस विभागाला करण्यात येणार असल्याचे महावितरणने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here