वर्धा : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या सुधारीत विधी सेवा बचाव पक्ष प्रणालीनुसार सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांच्याहस्ते जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीत सुरु करण्यात आलेल्या लोक अभिरक्षक कार्यालयाचे आभासी पध्दतीने उद्घाटन झाले.
सोमवार पासुन हे कार्यालय कार्यान्वित करण्यात आले आहे. या कार्यालयात प्रमुख विधी सहाय्य बचाव पक्ष वकील म्हणुन ॲड. सुशांत काशीकर, सहाय्यक विधी सेवा बचाव पक्ष वकील म्हणुन ॲड. मनीष सावरकर, ॲड. प्राची भगत, ॲड. कल्याणी गडपाल, ॲड. दिनेश कोल्हे यांची नेमणूक करण्यात आली आहे. ज्याप्रमाणे फौजदारी प्रकरणांमध्ये फिर्यादी पक्षाची बाजू न्यायालयासमोर सरकारी वकील मांडतात त्याप्रमाणेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे फौजदारी प्रकरणांमध्ये मोफत विधी सहाय्य मिळण्यासाठी आरोपींनी केलेल्या अर्जानुसार उपरोक्त लोक अभिरक्षक कार्यालयातील वकीलाची नेमुणूक केली जाईल. या वकीलांमार्फत बचाव पक्षाची बाजू न्यायालयासमेार मांडली जातील. या कार्यालयामार्फत मोफत विधी सेवा ही अटक होण्यापुर्वी पासुन ते निकाल झाल्यानंतर वरीष्ठ न्यायालयात अपील दाखल करेपर्यंत दिली जातील, असे विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव विवेक देशमुख यांनी कळविले आहे.