वर्धा : हिंदनगरात २० फेब्रुवारीला मध्यरात्री आठ ते नऊ चारचाकींच्या काचा फोडल्याची घटना घडली. या घटनेने हिंदनगर परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी नूतन जिंदे यांनी रामनगर पोलिसात २१ फेब्रुवारी रोजी सकाळी तक्रार दिली.
२१ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सर्व जण गाढ झोपेत असताना तीन युवक हातात टॉमी आणि रॉड घेऊन आले आणि थेट रस्त्याकडेला उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडण्यास सुरुवात केली, हा गभीर प्रकार असून, यात अमोल कांबळे, किशोर लाखे, नंदकिशोर शर्मा, कुशल फुलसुंगे, नूतन जिंदे, योगेश भानारकर, अमोल जोईवाले, लीना राऊत यांच्या चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. चारचाकीच्या काचा फोडल्यानंतर झालेल्या आवाजामुळे नागरिक घराबाहेर आले असता तिघांनीही तेथून पळ काढला. विशेष म्हणजे यापूर्वीदेखील असा प्रकार हिंदनगर परिसरात घडला होता. अशा माथेफिरूवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांची आहे.