वर्धा : मंगळवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू असताना ग्रामीण भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. अशातच परसोडी येथील एका शेतकऱ्याच्या शेतात वीज पडल्याने शेतातील गोठा पूर्णत: जळून खाक झाला. ही घटना मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली, यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला.
आर्वी तालुक्यातील परसोडी गावात मोहनसिंग पंढरे यांची शेती आहे. आधीच सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना शेती करणे कठीण झाले असून, संपूर्ण पिके पाण्याने खरडून गेली आहे. अशातच त्यांच्या शेतात दुपारच्या सुमारास वीज पडल्याने शेतात असलेल्या गोठ्याला आग लागून गोठ्यात असलेले तीन ते चार वाहनांतून आणलेले कुटार, बासे तसेच इतर शेतीउपयोगी साहित्य जळून खाक झाले. यात शेतकरी मोहनसिंग यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.