वर्धा : केंद्र शासनाने ३० मे २०२२ च्या पत्रान्वये राज्यातील नाफेड व भारतीय खाद्य निगमद्वारा चणा खरेदीची मुदत १८ जून २०२२ पर्यंत दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील चणा उत्पादकांना दिलासाच मिळाला आहे. राज्यात हमीभावाने चणा खरेदीसाठी केंद्र शासनाने १७ फेब्रुवारी २०२२ च्या पत्रान्वये एकूण ६,८९२१५ मे. टन उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्याअनुषंगाने ०१ मार्च २०२२ पासून प्रत्यक्ष खरेदी सुरू करण्यात आली. या अंतर्गत २९ मे २०२२ पर्यंत एकूण ३ लाख ६९ हजार ९६९ शेतकऱ्यांकडून ६७,१३.०३५.४५६ क्विंटल चणा खरेदी करण्यात आला आहे.
राज्याच्या तिसऱ्या आगाऊ अंदाजाच्या ३३.८३ लाख मे. टन अपेक्षित उत्पादनाच्या आधारे ३० मे २०२२ च्या पत्रान्वये केंद्र शासनाने ७,७६,४६० मे. टन सुधारित उद्दिष्ट निश्चित केले असून खरेदीचा कालावधी १८ जून २०२२ पर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यानुसार यापूर्वी निश्चित केलेल्या उत्पादकते प्रमाणे शेतकऱ्यांकडून चणा खरेदी करण्यात यावा याबाबतचे पत्र भारतीय खाद्य निगम, नाफेड सहीत सर्व यंत्रणांना सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभागद्वारा देण्यात आले असल्याची माहिती खा. रामदास तडस यांनी दिली आहे.