आर्वी : आर्वी तालुक्यातील सावळापूर नजीकच्या कृष्णा प्रायव्हेट लिमिटेड या कृत्रिम कोळसा बनविणाऱ्या फॅक्टरीला मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नाअंती परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असून या घटनेमुळे लाखोंचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
कृत्रिम कोळसा बनविणाऱ्या फॅक्टरीच्या मागील बाजूस शेत असून शेतकऱ्याने धुऱ्यावरील वाळलेले गवत व कचरा जाळला. याच आगीने बघता बघता फॅक्टरी परिसरातील साहित्याला आपल्या कवेत घेतल्याची चर्चा घटनास्थळी होती. आग लागल्याचे लक्षात येताच आर्वी व पुलगाव नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठून आगीवर पाण्याचा मारा करीत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे.