![](https://www.rashtrahitnews.in/wp-content/uploads/2023/11/WhatsApp-Image-2023-11-10-at-8.26.25-PM-1.jpeg)
मिनाक्षी रामटेके
वर्धा : ऑक्सिजनची कमतरता बघता शासनाने ऑक्सिजन स्वावलंबन मिशन सुरू केले. या योजनेला प्रतिसाद देत वर्ध्याच्या देवळीत एसएमडब्ल्यू इस्पात प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने ‘संगम ओ टू’ हा ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. येथे निर्माण होणारे ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी मोफत दिले जाणार आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.
देवळी येथील एसएमडब्ल्यू इस्पात प्रायव्हेट लिमिटेडने ऑक्सिजन स्वावलंबन मिशनअंतर्गत ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याचा निश्चय केला. कंपनीने त्याकरिता बेंगळूरू येथील ऑक्सिजन प्रकल्प तयार करणाऱ्या कंपनीशी संपर्क साधला. तिथे नायजेरीयाला जाण्यासाठी एक प्रकल्प तयार होता. संबंधितांशी संपर्क साधून कंपनीने विदेशात जाणारा हा प्लांट देवळीसाठी मिळवला. अवघ्या २१ दिवसांत कंपनीने प्लांटची उभारणी करीत हवेतून ऑक्सिजन निर्मिती सुरू केली आहे. येथे दररोज ५०० सिलिंडर ऑक्सिजन निर्मितीची क्षमता आहे.
वर्धा जिल्ह्याला प्रथम प्राधान्य देत कंपनीकडून प्रकल्पात तयार होणारा ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी नि:शुल्क दिला जाणार आहे. प्रशासनाकरवी याचे नियंत्रण केले जाणार असल्याची माहिती एसएमडब्ल्यू इस्पात प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक योगेश मानधनी यांनी दिली. प्रकल्पातील पहिली ऑक्सिजन सिलिंडरची खेप आमदार रणजित कांबळे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना केली गेली.