सेवाग्राम : देशासह जगात विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. इतकेच नव्हे, तर वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने प्रत्येक तरुणाने पुढे येत पर्यावरण वाचविण्यासाठी आपले योगदान द्यावे, हा संदेश देण्यासाठी नागपूर येथील तरुणांनी नागपूर- सेवाग्राम अशी सायकल यात्रा गणतंत्रदिनी पूर्ण केली.
पर्यावरणाचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्याच्या उद्देशाने नागपूर येथील सहा तरुणांनी एकत्र येत नागपूर-सेवाग्राम, अशी ७५ किमीची सायकल यात्रा पूर्ण केली. या सायकल यात्रेच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणासह वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, प्रदूषणमुक्त भारतचा संदेश देण्यात आला. नागपूर येथील विजय विचारे, राज बन्सोड, बैसाज वैष्णव, विकास पटेल, साई महाजन, मित्रदेव ढोरे यांनी ही सायकल यात्रा पूर्ण करून सेवाग्राम येथे राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन केले. सेवाग्राम येथे आल्यावर नवी उर्जाच मिळाली असल्याचे यावेळी यात्रेकरूंनी सांगितले.