आर्वी : आर्वी तालुक्यातील टोणा सर्कसपूर शिवारातील वर्धा नदीच्या पात्रात अमरावती जिल्ह्यातील धारवाडा येथील भारत रामराव काळे याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. ही घटना बुधवारी उघडकीस आली.
वर्धा नदीच्या पात्रात मृतदेह असल्याची माहिती मिळताच पोलीस पाटील विनोद बन्सोड यांनी आर्वी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर आर्वीचे ठाणेदार संजय गायकवाड यांच्या सूचनेवरून अमोल बर्डे, मनीष राठोड, अतुल भोयर, पांडुरंग फुगणार यांनी घटनास्थळ जाठून मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला. शिवाय मृताची ओळख पटविली. या घटनेची नोंद आर्वी पोलिसांनी घेतली असून मृतक भारत हा २५ मे रोजीपासून घरून बेपत्ता होता. तशी तक्रार काळे कुटुंबीयांनी कुऱ्हा पोलीस ठाण्यात दिली आहे, असे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. पुढील तपास आर्वी पोलीस करीत आहेत.