![](https://www.rashtrahitnews.in/wp-content/uploads/2023/11/WhatsApp-Image-2023-11-10-at-8.26.25-PM-1.jpeg)
वर्धा : ‘एका गर्भवती महिलेच्या घरी भल्या पहाटे दोन अज्ञात महिला आल्या. त्यांनी तिला घराबाहेर नेऊन तिचे बाळांतपण करून नवजात बालकासह दोघींनीही पळ काढला’, यासंदर्भात प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचताच सर्वत्र खळबळ उडाली; परंतु पोलिसांनी सखोल तपास केला असता महिलेने आपला गर्भपात लपविण्यासाठीच हे कुभांड रचल्याचे उघडकीस आल्यानंतर अनेकांचा जीव भांड्यात पडला.
शहरातील शास्त्री वॉर्ड परिसरातील एक विवाहिता गर्भवती असताना काही महिन्यांपूर्वीच तिचा गर्भपात झाला. मात्र, भीतीपोटी तिने ही बाब कुटुंबापासून लपवून ठेवली होती. प्रसूतीची वेळ जवळ येत असल्याचे पाहून तिने हा सारा खटाटोप केला. “कोणीतरी जादूटोणा केल्यानेच हा प्रकार घडला असून, दोन अज्ञात महिलांनी गुरुवारी पहाटे येऊन मला घराबाहेर नेले. अज्ञानस्थळी नेऊन बाळांपण केल्यानंतर त्यांनी नवजात बाळाला घेऊन पळ काढला, असे सकाळी पती व कुटुंबीयांना सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी तिला उपजिल्हा रुणालयात दाखल केले. महिलेची वैद्यकीय तपासणी केली असता जवळच्या काळात बाळांतपण झाल्याचे कोणतेही लक्षण आढळून आले नाही. दरम्यान, हा प्रकार पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला. पोलिसांनीही याप्रकरणी सखोळ चौकशी केली असता हे धक्कादायक वास्तव पुढे आल्याचे ठाणेदार संपत चौहान यांनी सांगितले, महिलेची मानसिक स्थिती असंतुलित असल्याने तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविल्याचे डॉ. किशोर चाचरकर यांनी सांगितले.