संजय धोंगडे
सेलू : तालुक्यातील हमदापूर मौज्यातील २६ वर्षापूर्वी माजी सैनिकांस शासनाकडून सिलींगमध्ये मिळालेल्या शेतजमिनीवर दुसर्याने बळजबरीने ताबा घेत शेती करण्यापासून शेतमालकास वंचीत ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या जमीनीचा ताबा आपल्याला मिळावा म्हणून या माजी सैनिकाचे पत्नीची फरफट सुरू असून यासाठी ती शासकीय कार्यालयाचे उबंरठे झिजवत आहे.
२६ वर्षापासून या महिलेला या शेतजमीनीचा ताबा न मिळणे ही एक शोकांतिका असून या महिलेने न्यायासाठी आता कुणाकडे दाद मागावी असा प्रश्न विचारला जात आहे.
सध्या वर्धा येथे वास्तव्यास असलेल्या श्रीमती पुष्पलता सुरेश वीर हिचे पती हे सैन्यदलात कार्यरत होते त्यांचे सेवानिवृत्ती नंतर शासनाच्या वतीने सिलींग मधिल मौजा हमदापूर येथील सर्वे नं १५७ आराजी १.६१ हेक्टर शेतजमीन मिळाली ता. १३-०९-१९९३ ला तसे आदेश काढून ता. ०३-०९-१९९४ मध्ये या जमीनीचे वाटप त्यांना करण्यात आले पटवारी रेकॉर्डला तशी त्याचे नावाची नोंद आहे यानंतर सन २०१० मध्ये पतीचे निधनानंतर त्यांच्या पत्नी व मुलाचे नावाची नोंद सातबारामध्ये घेण्यात आली आहे. परंतू सुरवातीपासूनच या शेतजमिनीवर तेथील बापूराव शेंडे व आता त्याचे पुत्र रविंद्र शेंडे व मनोहर शेंडे या दोघांनी ताबा घेत जमीन कसणे सुरू ठेवले हे दोघेही या जमीनीचा ताबा सोडण्यास तयार नाही ही जमीन आम्ही वाटपापुर्वी विकत घेतल्याचा आव आणत दिवाणी न्यायालयात मालकी हक्क घोषित करण्याबाबत सन २००९ मध्ये दावा दाखल केला होता तो कुठलाही आधार नसल्याने नामंजूर करण्यात आला याउपरांत ज्यांनी या जमीनीवर बेकायदेशीर ताबा मिळवला ते आजही ताबा सोडण्यास तयार नाही त्यांचा जोर पाहता या माजी सैनिकाचे पत्नीने तहसीलदार सेलू यांचे कडे तक्रार दाखल करून न्यायाची मागणी केली. या माजी सैनिकाचे पत्नीची न्यायासाठी होत असलेली फरफट पाहता शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
या जगात न्याय नाही
माझे पतीने सैन्यदलात काम करत देशाची सेवा केली सेवानिवृत्ती नंतर सन्मानाने जगता यावे म्हणून शासनाच्या वतीने सिलींग मधिल ही जमीन दिली येथे मी फक्त नावालाच मालकीन आहे माजी सैनिकाचे पत्नी असून मला जमीनीचा ताबा मिळवण्यासाठी २६ वर्षापासून संघर्ष करावा लागत आहे. या जगात न्याय राहला नाही शासनही अशा लोकांसमोर हतबल असल्याचे दिसून येते आता मी न्यायासाठी कुणाकडे दाद मागावी असा टाहो फोडत असताना तिचे डोळ्यात पाणी तरंगत होतं.