सेलू : बंद असलेला विजेचा प्रवाह सुरळीत करतांना करंट लागून अंकुश रत्नाकर भगत (वय 30) रा. महाबळा या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार 25 डिसेंबर रोजी सेलू तालुक्यातील महाबळा शेतशिवारात घडली. देवराव बजाईत यांच्याकडे शेती कामासाठी मृतक अंकुण भगत हा कामावर होता. शेतातील वीज पुरवठा बंद असल्याने सुरळीत करण्यासाठी शेतमालकाने सदर युवकाला शेतातील धुर्यावर असलेल्या रोहित्रावर चढविले होते. ट्रान्सफर्मारमध्ये वायर टाकत असतांना विजेचा धक्का लागून अंकुशचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती सेलू पोलिसांना देताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. पोलिस पाटील गणेश चांभारे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनात सेलू पोलिस करीत आहे.