

पुलगाव : वर्धा नदीच्या आपटी रेती घाटावर अवैधरित्या रेती उत्खनन करणाऱ्या टोळीवर पुलगाव पोलिसांनी धाड टाकून तब्बल २१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी पहाटेच्या सुमारास करण्यात आली. पाच आरोपी फरार असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वात पो.उपनिरीक्षक सुधीर बनकर, सफौ दीपक जाधव, पो.शि. संदीप बोरबन व पो.शि. उमेश बेले यांच्या पथकाने केली.
गुप्त माहितीवरून पथकाने पहाटे २.२० वाजता आपटी घाटावर छापा टाकला. त्या वेळी घटनास्थळी चार ट्रॅक्टर ट्रॉलीसह उभे होते. पोलिसांची चाहूल लागताच राज ऊर्फ राजू नाहारकर (रा. सुदर्शन नगर), महेश कौरती (रा. खातखेडा), प्रविण गवते, छत्रपती जांभोडे, नरेश मसराम (रा. नाचणगाव) हे पाच जण पळून गेले. मात्र, हनुमान परचाके (वय ३५, रा. शेन्द्री) हा घटनास्थळी आढळून आला. चौकशीत त्याने इतर आरोपींची नावे उघड केली.
पोलिसांनी घटनास्थळावरून सोनालीका व जॉन्डेर कंपनीचे चार ट्रॅक्टर आणि चार ट्रॉली (बहुतेक बिननंबरच्या) असा अंदाजे २१ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पुलगाव पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३०३(२), ६२, ३(५) सह मोटार वाहन कायद्यानुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.