

वर्धा : “केळीचं सोनं करायचंय… पण शाश्वत मार्गानं!” या जिद्दीनं आणि दूरदृष्टीनं नांगरलेल्या विदर्भ बनाना फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या सर्वसाधारण सभेचं आयोजन कुंदन वाघमारे यांच्या शेतात पार पडली या सभेला तब्बल ६१ भागधारक शेतकरी उपस्थित होते. उत्साही वातावरणात पार पडलेल्या या बैठकीत नव्या संचालक मंडळाची निवड झाली आणि विदर्भातील केळी उत्पादकांच्या भविष्यासाठी नव्या दिशा ठरवण्यात आल्या.
यावेळी ‘केळी रत्न’ म्हणून परिचित असलेले विदर्भ बनाना फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष कुंदन वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीच्या उपाध्यक्षपदी प्रमोद भाऊ ओंकार, सचिवपदी बाबाराजे रहाटे आणि कोषाध्यक्षपदी घनश्याम माहुरे, पुरुषोत्तम जावडेकर, भीमराव परतेकी, ज्योतीताई ठाकरे, प्रमोद भाऊ देहारे, प्रकाश सिंग बैस, सुनिता ताई चवरे, अलकाताई राऊत, मिलिंदरावजी लाड, देवेंद्र महाजन, मोरेश्वर सिंगन जुडे आणि संजीत राय यांची एकमताने निवड करण्यात आली.
सभेत विदर्भातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. भागधारकांना विविध सवलतींचा लाभ, अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित केळी लागवड, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये विदर्भातील केळीला योग्य दर व दर्जा मिळवून देण्याची दिशा यातून स्पष्ट झाली. कंपनीचा उद्देश पारंपरिक शेतीपद्धतीला फाटा देत, नव्या प्रयोगशील तंत्रज्ञानाच्या आधारे उत्पादनात वाढ घडवून आणण्याचा आहे. निर्यातक्षम उत्पादनासाठी आवश्यक ते सर्व प्रशिक्षण, सुविधा व बाजारपेठ विकासाची बांधीलकी कंपनीने यावेळी अधोरेखित केली.