
पवनार : गावातील धान नदीवरून जवळपासच्या गावांना पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी गेल्या महिनाभरापासून ‘लिकेज’ असून मार्गांवर रोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. पाण्यामुळे मार्गावरील वाहतूकीस अडथळा निर्माण होत असून अपघाताचाही धोका वाढला आहे.
पवनार बसस्थानक चौकातून सेवाग्रामकडे मोठ्या प्रमाणात वाहने सुसाट वेगाने धावतात. नागपूरकडून येणारी वाहनेही सेवाग्रामसाठी याच मार्गाचा उपयोग करतात. सेवाग्रामकडे जाणारी मुख्य चौकातील जलवाहिनी फुटली असल्याने रोज रस्त्यावर पाणी वाहते आहे. या लिकेजला महिना लोटून गेला आहे. मात्र संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. सेवाग्राम बसस्थानक चौकात मंदिर आहे. या मंदिरात रोज भाविक दर्शनासाठी येतात. मार्गावर वाहने उभे करून दर्शनासाठी उभे राहतात. एकीकडे मार्ग अपूर्ण असल्याने मोठी व जडवाहने काढण्यास तारेवरची कसरत करावी लागते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाण्याचा विसर्ग सुरू असून अपघाताचा धोकाही बळावला आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देत ‘लिकेज’ दुरूस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.





























































