सेलू : शेतकऱ्याच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत त्याच्या भावाने बोगस विक्रीपत्राच्या आधारे तत्कालीन तलाठी आणि राजस्व निरीक्षकांना हाताशी धरून जमीन आपल्या नावावर करून घेतली, महसूल विभागाच्या भोंगळ कारभाराने ते हक्कांपासून वंचित झाले आहेत.
घोराड येथील गुणाबाई नत्थुजी सुरकार यांनी १.४८ हेक्टर शेतजमीन मूलबाळ नसल्याने पुतण्या नारायण सुरकार यांची मुले रामभाऊ आणि रंगराव यांच्या नावे बक्षीसपत्र करून दिली. २६ जुलै १९७४ ला अनुक्रेमाक २९८६ नुसार हे बक्षीसपत्र असून तशी नोंद वर्धा येथील उपनिबंधक कार्यालयात आहे. हे बक्षीसपत्र दाबून ठेवत रामभाऊने तलाठीव राजस्व निरीक्षक यांना हाताशी धरून त्याच तारखेचे विक्रीपत्र दाखवीत ही जमीन स्वतःच्या नावे केली. ११ मे १९७९ रोजी फेरफार पंजीमध्ये रामभाऊ यांच्या नावाने खरेदी हक्काने नोंद घेतल्याचा उल्लेख आहे. वास्तविक, २६ जुलै १९७४ रोजी अशी कोणतीही विक्री झाल्याची नोंद नाही.
उपनिबंधक कार्यालयात त्या तारखेला पाच विक्रीपत्रे झाली, तर सहावे बक्षीसपत्र आहे. हे विशेष. दरम्यान, 3१ डिसेंबर २०२० रामभाऊ सुरकार यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर वारस नोंद म्हणून पत्नी चंद्रकला ऊर्फ रंजना सुरकारयांच्या नावाची नोंद घेतली गेली. चंद्रकलायांनी गौरव प्रशांत चरडे यांना 3 जानेवारी २०२२ विक्रीपत्र करून दिले. याबाबतरंगराव यांच्यामार्फत पत्नी व मुलाने सेलू तहसीलदारांकडे तक्रार दाखल केली. अर्जदारांना दिवाणी न्यायालयात दाद मागण्याचा आदेश केला. न्यायालयाचा मार्ग उपलब्ध झाला असला तरी आतापर्यंतच्या हेलपाट्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.