वर्धा : कोजागरीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ५१ वर्षीय व्यक्तीने भाडेकरू असलेल्या २८ वर्षीय युवतीचा विनयभंग केल्याची घटना श्रीनिवास कॉलनी परिसरात घडली. नारायण नामक व्यक्तीने त्याच्या घरी कोजागरी निमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. परिसरातील नागरिकही त्याच्या घरी उपस्थित होते.
नारायण भाडेकरू असलेल्या युवतीला नाश्ता करण्यासाठी बोलाविण्यास गेला असता त्याने युवतीचा विनयभंग केला. युवतीने आरडाओरड केली असता नारायणने अंधाराचा फायदा घेत तेथून पळ काढला. ही बाब युवतीने तिच्या आईला सांगितली असता आईने थेट रामनगर पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. विनयभंगाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत चालली असून त्यामुळे महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आल्याचे जिल्ह्यात घडणाऱ्या घटनांमधून पुढे आले आहे. याला विकृत मानसिकता कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येत आहे.