आर्वी : येथील नेताजी सुभाषचंद्र बोस पुतळ्यासमोर दोन गटात चांगलाच राडा झाला. पाहता पाहता लाठ्या काठ्याही निघाल्या. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. तब्बल दीड तास वाहतूक विस्कळीत झाली होती. हा सर्व प्रकार घडत असताना पोलिस विभाग केवळ बघ्याच्या भूमिकेत असल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला.
कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांचे आहे. मात्र, याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने नागरिकात संतापाची लाट उसळली आहे. नेताजी सुभाषचंद्र चौकात कायमस्वरूपी टवाळखोरांची मोठी गर्दी असते. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास क्षुल्लक कारणातून दोन गटांत वाद सुरू होता. मात्र काही वेळ लोटताच चांगलाच राडा झाला, नागरिकांनीही मोठी गर्दी केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. जवळपास एक ते दीड तास ही वादावादी सुरू होती. मात्र, याबाबतची माहिती पोलिसांना नसणे ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.