

वर्धा : सेवाग्राम विकास आराखडया अंतर्गत सेवाग्राम वर्धा परिसरात पायाभुत सुविधा निर्माण करण्यासाठी विउद्ध कामे सुरू आहेत. ही कामे संथ गतीने होत असून सदर कामांना गती देऊन तात्काळ पूर्ण करावी अशा सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिल्यात.
तसेच सदर कामे करतांना शासकिय जागेसोबतच संस्थेची जागा असल्यास समन्वयाने व संस्थेच्या परवाणगीने बांधकाम करावे असेही त्यांनी सांगितले. सेवाग्राम विकास आराखडा संबंधीत समितीच्या बैठकित त्या बोलत होत्या. बैठकिला उपवन संरक्षक राकेश शेपट, जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेभुर्णे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश बुब, अपर पोलिस अधिक्षक यशवंत सोळके, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अडयाळकर असोसिएटच्या श्रीमती अडयाळकर, आदी उपस्थित होते.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभावीपणे प्रसार करणे व त्यांचा वारसा जतन करण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी एक अनुभुती हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी नव्याने 53 कोटी 11 लाख 13 हजार रुपये आराखडा तयार करण्यात आला आहे. सेवाग्राम येथील अण्णातलावाच्या सौदर्यीकरणात वन विभागाच्या जागेचा प्रश्न येत असल्याने सदर जागेवर बांधकाम न करता वन विभागाच्या वतीने वन उद्यान तयार करुन घ्यावा.
नविन कामांमध्ये वर्धा शहरातील टेकडयांचे सौदर्यीकरण करुन टेकड्यांवर मोठ्या प्रमाणात वृक्षा रोपण करावे, यासाठी स्वयंसेवी संस्थांना सदर टेकडयांची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सोपवावी. धामनदीवर फाऊंटेनची निर्मिती करण्यासाठी संबंधित संस्थेने पॉवर प्रेजेंटेशन सादर करण्याच्याही सुचना यावेळी देशभ्रतार यांनी दिल्यात.