
पवनार : सकाळची वेळ… धाम नदीच्या किनाऱ्यावर वातावरण गंभीर झालेले. कुणाच्या डोळ्यांत अश्रू, कुणाच्या ओठांवर मंत्रोच्चार, तर कुणाच्या मनात आपल्या प्रिय व्यक्तीला दिलेला अखेरचा निरोप. दूरदूरवरून नागरिक आपल्या नातेवाईकांच्या अस्थी आणि रक्षा विसर्जनासाठी पवनारच्या धाम नदीत येतात. धार्मिक विधी पूर्ण होतात, भावना नदीच्या प्रवाहात विरघळतात आणि नातेवाईक परतीच्या प्रवासाला निघून जातात. मात्र, यानंतर नदीकाठी सुरू होते ती दुसरीच कहाणी… जगण्यासाठीची, उपजीविकेसाठीची आणि संघर्षाची.
रक्षा विसर्जनानंतर नदीच्या पाण्यात मिसळलेल्या राखेत काही वेळा सोन्या-चांदीचे सूक्ष्म कण राहतात, अशी धारणा आहे. याच आशेवर काही गरजू कुटुंबांचे आयुष्य अवलंबून आहे. हातात चलणी, ताटे, बादल्या किंवा साधी लोखंडी जाळी घेऊन महिला, पुरुष आणि लहान मुले नदीच्या पात्रात उतरतात. राख चाळली जाते, गाळ गाळला जातो आणि प्रत्येक चाळणीत आशेचा किरण शोधला जातो. एखादा छोटासा सोन्याचा कण मिळाला, तर त्या दिवसाची भाकर निश्चित होते; अन्यथा पूर्ण दिवसाची मेहनत पाण्यात जाते.
धाम नदीकाठचा हा संघर्ष केवळ आजचा नाही. काही कुटुंबे पिढ्यानपिढ्या हे काम करत आहेत. गरिबी, बेरोजगारी आणि पर्यायी रोजगाराचा अभाव यामुळे त्यांनी नदीलाच आपला उदरनिर्वाहाचा आधार बनवले आहे. अनेकांना या कामाशिवाय दुसरा पर्याय नाही. आज काही सापडलं तर घरात चूल पेटते, नाहीतर उपाशी झोपावं लागतं, अशी वेदनादायी प्रतिक्रिया काही महिलांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे, या कामात लहान मुलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून येतो. उन्हाच्या तडाख्यात, कधी थंड पाण्यात तासन्तास उभे राहून ही मुले राख चाळतात. त्यांच्या हातात पुस्तकांऐवजी चलणी दिसते आणि शाळेच्या वर्गखोल्यांऐवजी नदीपात्र त्यांचे वास्तव बनते. शिक्षण, बालपण आणि सुरक्षित भविष्य या गोष्टी गरिबीपुढे हरवत असल्याचे चित्र येथे पाहायला मिळते.
नदीतील पाणी अनेकदा अस्वच्छ असते. रक्षा विसर्जनासोबत येणारे कपडे, प्लास्टिक, फुले, धार्मिक साहित्य आणि इतर कचऱ्यामुळे नदीपात्र प्रदूषित होत आहे. अशा पाण्यात दिवसभर काम करणाऱ्या या कुटुंबांना त्वचारोग, संसर्गजन्य आजार आणि इतर आरोग्य समस्यांचा धोका कायम असतो. तरीही उदरनिर्वाहासाठी त्यांना दररोज या पाण्यात उतरावे लागते.
काही वेळा दिवसाभरात फारच कमी धातूचे कण मिळतात. मिळालेल्या कणांची विक्री करून मिळणारे पैसेही अत्यल्प असतात. मात्र, हाताला दुसरे काम नसल्याने ही मंडळी हा संघर्ष सुरू ठेवतात. काही कुटुंबांनी नदीकाठच आपले जीवन उभे केले असून त्यांचे संपूर्ण अर्थचक्र या कामावर अवलंबून आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, इतक्या वर्षांपासून हा प्रकार सुरू असतानाही या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी किंवा पर्यायी रोजगारासाठी ठोस प्रयत्न झाल्याचे दिसून येत नाही. सामाजिक सुरक्षितता, आरोग्य सुविधा, मुलांच्या शिक्षणासाठी विशेष योजना किंवा रोजगार प्रशिक्षण यांचा अभाव असल्याने ही कुटुंबे आजही गरिबीच्या दुष्टचक्रात अडकलेली आहेत.
प्रशासनाने या विषयाकडे केवळ धार्मिक परंपरा म्हणून न पाहता सामाजिक आणि मानवी दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. नदी स्वच्छता, रक्षा विसर्जनासाठी स्वतंत्र व्यवस्थापन, पर्यावरणपूरक विसर्जन पद्धती आणि या कुटुंबांसाठी पुनर्वसन योजना राबविणे आवश्यक आहे. तसेच लहान मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची मागणीही होत आहे.
पवनारच्या धाम नदीत दररोज उलगडणारे हे दृश्य केवळ श्रद्धेचे नाही, तर ते आहे संघर्ष, गरिबी आणि आशेचे जिवंत वास्तव. एका बाजूला नदीत वाहणारी श्रद्धा आणि दुसऱ्या बाजूला त्याच राखेतून जीवन शोधणारे हात… ही वेदनादायी कहाणी आजही शांतपणे वाहत आहे.
श्रद्धेनंतर सुरू होतो जगण्यासाठीचा संघर्ष…
अस्थी आणि रक्षा विसर्जनासाठी येणारे नागरिक परतल्यानंतर धाम नदीत काही कुटुंबांची उपजीविकेची लढाई सुरू होते. राखेतून सोन्या-चांदीचे सूक्ष्म कण मिळतील, या आशेवर महिला व लहान मुलेही नदीत उतरतात. दिवसभर मेहनत करून एखादा छोटासा कण मिळाला तरच घरची चूल पेटते. अस्वच्छ पाणी, आरोग्याचा धोका आणि शिक्षणापासून दूर जाणारे बालपण हे वास्तव अधिक वेदनादायी बनत आहे. गरिबीमुळे नदीच या कुटुंबांचा आधार बनली आहे.




























































