

वर्धा : बजाज चौकात तब्बल 362 दिवसांपासून सुरू असलेले शेतकरी, कामगार धरणे आंदोलन शनिवारी 11 डिसेंबरपासून स्थगित करण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. यावेळी भारताच्या तिन्ही सेनादलाचे पहिले प्रमुख बिपीन रावत व 13 जवानांना आंदोलनस्थळी भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दिल्ली येथे 26 नोव्हेंबर 2020 पासून सुरू झालेल्या अविरत, अखंडित, अहिंसक शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व तीन काळ्या कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी वर्धेतील रहदारीच्या मुख्य बजाज चौकात 15 डिसेंबर 2020 पासून वर्धेतील 42 सामाजिक संघटना व भाजपाशिवाय सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन समन्वय समितीच्या पुढाकाराने शेतकरी, कामगार धरणे आंदोलन सुरू केले होते.
आजच्या आंदोलनांचे नेत्रृत्व पुरूषोत्तम हिवशे व शेख इरफान या शेतकरी बांधवांनी केले. तर संदिप भगत दिपक भोंगाडे, राजेश राऊत, चंन्द्रशेखर बाबाराव गोडघाटे, गंगाधर वाघमारे, महेंद्र डूकरे, नितीन चौव्हाण, कमलाकर राऊत. दशरथ मोहिते, अरुण गायकवाड, धर्मपाल पाटील, धर्मा डूकरे, पद्माकर कांबळे, नजीर शेख यासह पूर्णवेळ आंदोलनात सहभाग घेणारे अबधेश, मुस्लीम मंचच्या परविन शेख, शेतकरी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. प्रमोद टाळे, संघर्ष संघटनेचे मजानन पखाले, महाराष्ट्र अंनिसच्या श्रेया गोडे, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश बोरकर, मधुकर भोयर, दिवाकर शंभरकर, एस. एम. कांबळे, बहूजन संघर्षचे प्रमोद नगराळे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यप्रधान सचिव गजेंद्र सुरकार सिटूचे मोहन मसराम आंदोलनात सहभाग नोंदविला.