

वर्धा : कोरोना संसर्गानंतर बुरशीजन्य म्युकरमायकोसिस झाल्याचे कळताच रुग्णाच्या नातेवाइकांना येणाऱ्या खर्चामुळे अक्षरश: धडकी भरते. म्युकरमायकोसिस आजार जडलेल्या रुग्णाचा खर्च पाच लाखांपासून १५ लाखांपर्यंत असू शकतो. कोरोनाच्या संकटकाळात अनेकांना रोजगार गमवावा लागला. वेतनकपातीला सामोरे जावे लागले. व्यवसायावर विपरीत परिणाम झाला. अशा परिस्थितीत उपचाराकरिता पैसा कोठून आणायचा, असा यक्ष प्रश्न सर्वसामान्यांपुढे उभा ठाकला असतानाच या रुग्णांसाठी राज्य शासनाची ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ नवसंजीवनी ठरली आहे.
वर्धा जिल्ह्यात सुमारे १०० रुग्णांवर या योजनेतून लाखो रुपयांचे उपचार पूर्णपणे मोफत करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत ११९ म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत. वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय आणि सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. योजनेअंतर्गत आतापर्यंत असंख्य रुग्णांवर उपचार करण्यात आले असून, बरे होऊन ते घरीही गेले आहेत. सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात म्युकरमायकोसिसचे १०५ रुग्ण दाखल झाले.
यातील ८७ रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत उपचारांचा लाभ देण्यात आला, तर सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात आतापावेतो १४ रुग्ण दाखल झालेत. यातील बारा रुग्णांवर योजनेंतर्गत मोफत उपचार करण्यात आले असल्याची माहिती महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या जिल्हा समन्वयक डॉ. स्मिता हिवरे यांनी दिली.
केवळ वर्ध्यातीलच नव्हे, तर म्युकरमायकोसिसच्या राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात राहणारा रुग्ण असो, त्याच्यावर वर्ध्यात महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार करण्यात आले आहेत. त्यासाठी केवळ रुग्णाला ही योजना असलेल्या रुग्णालयात दाखल होणे गरजेचे आहे. तसेच केवळ रेशनकार्ड (शिधापत्रिका) मग ते कोणतेही असो, अगदी शुभ्र (पांढरी) असली तरी व ओळख पटविण्यासाठी एक ओळखपत्र, ज्यात आधार कार्ड, वाहन परवाना, बँक पासबुक, मतदान कार्ड, संस्थेचे ओळखपत्र आदींचा समावेश आहे. ही कागदपत्रे संकलित केल्यास रुग्णांना योजनेअंतर्गत मोफत उपचार दिले जातात.