
वर्धा : विनोबा भावे आश्रमाच्या मागील भागाकन पवनार- सुरगाव मार्ग जातो. या मार्गाचे नव्याने डांबरीकरण मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात येणार होते. त्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने नाल्यांचे खोदकाम करण्यात आले. त्यानंतर पाऊस झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांची अडचण मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
सध्या खरीप शेती हंगामाची लगबग सुरू असून, शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते शेतात न्यावी लागतात. परंतु या रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्यांचे खोदकाम झाले आहे. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर चिखल साचला आहे. अशा चिखलयुक्त मार्गातून आवागमन करणे कठीण झाले आहे. काही वर्षांपूर्वी वा मार्गाचे माजी आमदार विश्वनाथ डायगव्हाणे यांच्या निधीतून डांबरीकरण करण्यात आले होते.
त्यानंतर या रस्त्याची डागडुजी झाली नाही. त्यामुळे रस्त्याला जागोजागी खड्डे पडले होते. त्यामुळे या भागातील नागरिक व शेतकऱ्यांनी सदर मार्गाचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर खासदार रामदास तडस यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत या मार्गाचा समावेश केला. पावसाळ्यापूर्वी काम सुरू झाले असले तरी केवळ नाल्यांचे खोदकाम झाल्याने पावसाळ्यातच शेतकऱयांची अडचण निर्माण झाली आहे.




























































