आज पासुन हॉटेल, रेस्टॉरंट ग्राहकांसाठी पन्नास टक्के क्षमतेने सुरु! ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या वाहनांना निर्बंधाविना वाहतुकीस परवानगी; हॉटेल्स, लॉज शंभर टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्यास परवानगी

सतीश अवचट

वर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लोकडाऊन मूळे अनेक दिवसांपासून बंद असलेले हॉटेल, रेस्टॉरंट, फुडकोर्ट्स सोमवार (ता. ५) ऑक्टोबरपासून ग्राहकासाठी पन्नास टक्के क्षमतेसह खुली करण्यास राज्यशासनाने जारी केलेल्या अनलॉक आदेशानुसार परवानगी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हॉटेल सुद्धा उद्यापासून सुरू करण्यास जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी आदेश दिले आहेत.

राज्यातील कोविड-19 च्या अनुषंगाने राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार वर्धा जिल्ह्यात 31 ऑक्टोबर पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू असणार आहे. मात्र नागरिकांनी अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडावे, जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी केले आहे.

कोरोना काळात ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या वाहनांना राज्यांतर्गत आणि दोन राज्यांमध्ये विना अडथळा, कोणत्याही वेळी वाहतूक करता येईल. ऑक्सिजन उत्पादक आणि पुरठादारांवर यासाठीचे कोणतेही निर्बंध असणार नाही.

या बाबींना मनाई असणार

सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग इन्स्टीट्युट या बंद राहतील. तथापि, ऑनलाईन, दूरस्थ शिक्षणास परवानगी राहील. चित्रपट गृहे, जलतरण तलाव, करमणूक उद्याने, थिएटर (मॉल्स व मार्केट कॉम्लेक्समधील) सभागृह, असेंब्ली हॉल यासारख्या इतर सर्व जागा बंद राहतील.

सर्व सामाजिक, राजकीय, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर मेळावे तसेच मोठ्या संख्येने लोक जमा होणारे कार्यक्रम, परिषदा बंद राहतील. सर्व धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळे सर्वसामान्यांसाठी बंद राहतील. तथापी तेथील नित्य नियमाचे धार्मिक कार्यक्रम संबंधित धर्मगुरू, पुजारी यांना करता येतील.

सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखु इत्यादी सेवन करण्यास मनाई करण्यात येत आहे. वय वर्षे 65 वरील व्यक्ती, दुर्धर आजार असणारे नागरिक यांना बाहेर पडण्यास प्रतिबंध राहील.

या बाबींना परवानगी राहील

सर्व हॉटेल व लॉजिंग शंभर टक्के क्षमतेने राहण्यासाठी चालू ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. तथापि शासनाने निर्धारित केलेल्या आदर्श कार्यप्रणालीचे पालन करणे बंधनकारक राहील. तसेच, व्यक्ती व वस्तू यांच्या आंतरजिल्हा हालचालींवर कोणतीही बंधने राहणार नाहीत. अशा हालचालींसाठी वाहने आणि त्यातून प्रवास करणाऱ्या व्यक्तींसाठी स्वतंत्र परवानगी, मान्यता, इत्यादी परवान्याची आवश्यकता असणार नाही.

खाजगी बस, मिनी बस व इतर यंत्रणेद्वारे प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी राहील. तथापि त्याकरीता परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी निर्देशित केलेल्या आदर्श कार्य प्रणालीचे पालन करणे बंधनकारक राहील. बाह्य शारिरीक क्रियाकलाप (आऊटडोअर फिजिकल ऍक्टिव्हिटी) करण्यास कोणतेही बंधन असणार नाही.

खाजगी प्रवासासाठी टॅक्सी,कॅब, अग्रीगेटर 1 अधिक 3 प्रवासी, रिक्षा 1 अधिक 2 प्रवासी, चारचाकी 1 अधिक 3 प्रवासी, दोन चाकी 1 अधिक 1 प्रवासी मास्क व हेल्मेट्सह तसेच प्रवास करतांना कायम मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल.

सर्व दुकाने पूर्णवेळ चालू ठेवण्यास परवानगी राहील. मेडिकल, औषधाची दुकाने 24 तास सुरू ठेवता येतील.
जर पाच पेक्षा जास्त व्यक्ती दुकानात असल्यास अथवा सामाजिक अंतराचे पालन न केल्यास सदर दुकाने तात्काळ बंद करावीत.

जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई आहे. तथापि प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात 50 लोकांच्या मर्यादेत लग्न मेळावे, समारंभाचे आयोजन करण्यासाठी संबंधित उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील.

अंत्यविधी यासारख्या कार्यक्रमास 20 (संपूर्ण कार्यक्रमासाठी) व्यक्तींना सामाजिक अंतर ठेऊन परवानगी राहील. वृत्तपत्र छपाई आणि वाटप करणेस परवानगी देण्यात येत आहे. (घरपोच वितरणासह)

पालन न केल्यास कारवाई होणार

सार्वजनीक ठिकाणी, घराबाहेर व घरामध्ये जेथे लोकांचा वावर आहे, तेथे असताना तोंडावर व नाकावर मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींवर 200 रु दंड आकारण्यात येईल. जिल्ह्यातील कोणत्याही सार्वजनिक अथवा ज्या ठिकाणी लोकांचा वावर जास्त प्रमाणात आहे अशा खाजगी जागेच्या ठिकाणी थुंकणेस मनाई असून, थुंकल्यास 200 रु दंड आकारण्यात येईल.

दुकानामध्ये प्रत्येक ग्राहकामध्ये किमान 6 फुट अंतर राहील याची खात्री करावी. तसेच दुकानामध्ये एकावेळी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना घेणेस मनाई करणेत येत आहे. जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी, लोकांचा वावर असणाऱ्या खाजगी ठिकाणी तसेच वाहतुकीच्या साधनामध्ये सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे.

कामाच्या ठिकाणी पुढील निर्देशांचे पालन करणे बंधनकारक

शक्य असेल त्या ठिकाणी घरातुन काम करण्यास प्राधान्य द्यावे. कामाच्या आणि व्यवसायाच्या वेळा या कार्यालयामध्ये कामाच्या ठिकाणी, मार्केटमध्ये, औद्योगिक तसेच व्यावसायीक आस्थापनेमध्ये गर्दी होणार नाही, अशा पद्धतीने विभागून द्याव्यात. थर्मल स्क्रीनिंग, हँडवॉश, सॅनिटायजर यांची प्रवेशद्वारावर व्यवस्था करावी. कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक उपयोगाच्या जागा व सामान्य माणसाच्या वापरात येणाच्या सर्व जागा व वस्तू यांचे वेळोवेळी सॅनिटायझेशन करण्यात यावे.औद्योगिक व व्यावसायिक आस्थापना यांनी त्यांचे कामगारामध्ये, कामाची पाळी बदलणेचे वेळी, जेवणाचे व इतर सट्टीचे वेळी, कामावर येतांना व कामावरुन परत जाताना सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे.

सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविण्यास संबंधीतांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय, कायदेशीर कारवाई संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी करावी. सदर आदेश 31 ऑक्टोबर या कालावधीकरिता संपूर्ण वर्धा जिल्ह्याचे हद्दीत लागु राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here