

वर्धा : जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध रस्ते विकासकामांचा आढावा घेत पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी कामाच्या गुणवत्तेबाबत आणि गतीबाबत स्पष्ट निर्देश दिले. रस्ते बांधकाम करताना नियोजनातील त्रुटींमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने ही कामे दर्जेदार व निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत एमएसआरडीसी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. हिंगणी-आंजी, हिंगणी-वडगाव ते झडशी या रस्त्यांच्या संथगतीबाबत नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत, कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. एका बाजूचे काम पूर्ण केल्याशिवाय दुसऱ्या बाजूचे खोदकाम करू नये, तसेच दिशादर्शक फलक व बॅरिकेट लावून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.
कंत्राटदारांविरोधात तक्रारी असल्यास चौकशी पूर्ण होईपर्यंत देयके रोखण्याचे आदेश देण्यात आले. गोपुरी चौक, पिपरी-उमरी रस्ता तसेच सेलू येथील न्यायालय व तहसील कार्यालयाच्या कामांना गती देण्याच्या सूचना करण्यात आल्या. पुलांच्या दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यावरही त्यांनी भर दिला. दरम्यान, कोतवाल संघटनेच्या विविध मागण्यांबाबत निवेदन स्वीकारून त्या शासन दरबारी मांडण्याचे आश्वासनही पालकमंत्र्यांनी दिले.
























































