
वर्धा : तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती, आई रमाई स्मृतीदिन आणि जयभीम धम्मशाळेच्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेली खुली कराओके बुद्ध-भीम गीतगायन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बुद्ध आणि भीमगीतांच्या सुरांनी परिसर दुमदुमून गेला असून रसिकांनी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
जयभीम बुद्धविहारातील ‘जयभीम धम्मशाळे’च्या वतीने आयोजित या स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी आपल्या सुमधुर आवाजातून बुद्ध-भीम गीते सादर करत उपस्थितांची मने जिंकली. गुरुवारी (दि. २८) सायंकाळी आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान धनंजय नाखले यांनी भूषविले, तर परीक्षक म्हणून रवी ढोके यांनी काम पाहिले.
स्पर्धेत कु. पलक वानखेडे हिने प्रथम क्रमांक पटकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अनुष्का भानसे हिला द्वितीय, तर हरीश दिघाडे यांना तृतीय क्रमांक मिळाला. विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. हे पुरस्कार स्मृतीशेष सरस्वती विनायक शेंडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विनायकभाऊ शेंडे यांच्या वतीने प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वीकृती वानखेडे आणि समृद्धी भगत यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. राजेश डंभारे यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सिद्धार्थ मून, अमित डांगे, समय मून, कविश कांबळे, सार्थक मून, धम्मशील लढे, सम्राट मून, हर्षवर्धन म्हैसकर, अर्णव जगताप, विवान कांबळे, प्रयासी डंभारे, सृष्टी इंगळे आणि रोमिशा वाघमारे यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला प्रा. प्रशांत जिदे, डॉ. रामकृष्ण मिरगे, रमेश जोगे, प्रा. मुन्ना नाखले, किशोर ढाले, प्रकाश जिंदे यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेने बुद्ध-भीम गीतांच्या माध्यमातून सामाजिक आणि सांस्कृतिक प्रबोधनाचा संदेश दिला.


























































