कचऱ्याला लागलेल्या आगीत घर जळून खाक ; देवतळे कुटुंब उघड्यावर

पवनार : “कचरा पेटवण्यात काय जातंय!” असा निष्काळजीपणा एका संपूर्ण कुटुंबाच्या संसारावर उठून बसला. पवनार येथील वार्ड क्रमांक १ मध्ये दुपारच्या सुमारास लागलेल्या आगीत निलेश देवतळे यांचे राहते घर आणि संपूर्ण संसारसामान भस्मसात झाला. ही हृदयद्रावक घटना २२ एप्रिल रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली.

रोडलगत साचलेल्या कचऱ्याला अज्ञात व्यक्तीने पेटवल्याने ही आग उठली. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण करत देवतळे यांच्या घराला वेढा घातला. यात गहू, तांदूळ, डाळ, दाणे, कपडे, फर्निचर आदी सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. इतकंच नव्हे, तर त्यांच्या राहत्या घराचे छप्पर आणि भिंतीसुद्धा आगीत कोसळल्या.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. बाळंतपणासाठी वापरली जाणारी चादरी असोत की मातीने भरलेले बादली–बांबू, मिळेल त्या साधनांनी आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. मात्र आगीचा कहर इतका होता की, ग्रामस्थांचे प्रयत्न तोकडे पडले. शेवटी वर्धा आणि सेलू येथून अग्निशमन दलाच्या गाड्या बोलवण्यात आल्या आणि त्यांच्या अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आली.

या आगीत सुमारे दोन ते तीन लाखांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. देवतळे कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले असून त्यांच्यासमोरील भविष्य अंधारात गेले आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने पाहून त्वरीत मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here