शेतीचा वाद विकोपाला, मारहाणीत जीव गेला! उपचारादरम्यान झाला मृत्यू

वर्धा : शेतीच्या जुन्या वादातून झालेला वाद विकोपाला गेल्याने एकाने तिघांना लाकडी दांड्याने जबर मारहाण केली. उपचारादरम्यान त्यातील एकाचा मृत्यू झाल्याची घटना फत्तेपूर शेतशिवारात घडली. याप्रकरणी पुलगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रवीण राजाभाऊ बाजारे रा.पळसगाव, असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत सुदर्शन बापुराव बाजारे व जगदीश बाजारे हे गुरुवारी सायंकाळी पावणेसात वाजतादरम्यान फत्तेपूर शिवारातून शेतीचे काम आटोपून घराकडे परत येत होते. यादरम्यान आरोपी प्रवीण बाजारे यांने जुन्या कारणावरुन वाद घालून सुदर्शन बाजारे यांना लाकडी दांड्याने मारुन जखमी केले. यासोबतच जगदीश बाजारे व रविकिरण वानखेडे यांनाही मारहाण केली. त्यामुळे या तिन्ही जमखींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिघांवरही उपचार सुरु असताना शनिवारी दुपारी २ वाजता सुदर्शन बाजारे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनास्थळ पुलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने पुलगाव पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here