भरारी पथकाला विद्यार्थ्यांजवळ आढळला मोबाईल! विद्यार्थ्यांवर केली कारवाई; केंद्र संचालकास नोटीस: केंद्र रद्द करण्याची सिफारस

वर्धा : बारावी परिक्षेच्या गणित विषयाचा पेपर सुरु असतांना परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थ्यांजवळ मोबाईल आढळून आला. भरारी पथकाच्या ही बाब निदर्शनास आल्याने मोबाईल जप्त करुन विद्यार्थ्यावर कारवाई करण्यात आली तसेच केंद्र रद्द करण्याची सिफारस करण्यात आली आहे.
इयत्ता १२ वी बोर्ड परिक्षेचा गणित विषयाच्या पेपरसाठी जिल्ह्यामध्ये ५५ केंद्रावर ६ हजार २२७ विद्यार्थी प्रविष्ठ होते. त्यापैकी ६ हजार १४५ हजर होते व ८२ विद्यार्थी गैरहजर होते. अतिसंवेदनशील व संवेदनशील असे एकूण ४४ केंद्रावर बैठे पथक नियुक्त करण्यात आले होते. जिल्ह्यामध्ये ८ विभाग प्रमुखांची ८ विशेष भरारी पथके तसेच विभागीय मंडळानी नियुक्त केलेले ६ भरारी पथके यांनी वेगवेगळ्या केंद्रास भेटी दिल्या.

यावेळेस शिक्षणाधिकारी माध्यमिक सचिन जगताप यांच्या भरारी पथकाने बोरगाव (मे) येथील सेंट जॉन कनिष्ठ महाविद्यालयाला भेट दिली असता एका विद्यार्थ्याजवळ चक्क मोबाईल आढळून आला. विभागीय मंडळाच्या सूचनेनुसार परीक्षा सुरु असताना मोबाईल वापरणे हा गुन्हा असताना सुद्धा विद्यार्थ्याजवळ मोबाईल आढळल्यामुळे मोबाईल जप्त करण्यात आला व त्या विद्यार्थ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. तसेच केंद्र संचालकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.
सदर केंद्र हे अतिसंवेदनशील केंद्रामध्ये मोडते व केंद्रावर अशा प्रकारचे गैरप्रकार होत असल्यामुळे सदर केंद्र रद्द करण्याकरिता विभागीय मंडळाकडे शिफारस करण्यात आली आहे, असे शिक्षणाधिकारी माध्यमिक सचिन जगताप यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here